नाशिक : कांदा या नावाने कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तर कधी याच कांद्याने सत्ताधाऱ्यांच्या सत्ता उलथवल्याचा इतिहास आहे. तरी हाच नाशवंत कांदा जास्त दिवस टिकल्यास कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळेल, अन् सामान्य माणसालाही कांदा परवडणाऱ्या दरात मिळेल, असे गुदाम सेन्स नावाचे उपकरण कल्याणी शिंदे या विद्यार्थीनीने तयार केले आहे. कांद्याचे आगार अशी नाशिक जिल्ह्याची ओळख आहे कांद्याचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाळीत कांदा साठवणूक केली जाते. चाळीत कांदा सडण्याचे प्रमाण जास्त असल्याने हे प्रमाण कमी कसे करता येईल, यादृष्टीने पाटोदा येथील कल्याणी शिंदे या विद्यार्थिनीने यावर उपाययोजना करण्यासाठी अभ्यास सुरू केला.
पायलट प्रोजेक्ट यशस्वी
चाळीतील कांद्याची नासाडी कशी टाळू शकतो यावर कामाला सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही कांदा पिकाची पूर्ण इको सिस्टिम अभ्यासली. नासाडी टाळण्यासाठी पेरणीपासूनच्या प्रक्रिया परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही काम सुरू केले आणि दोन डिव्हाइस विकसित केली क्लायमेट सेन्सर आणि गॅस सेन्सर कांदाचाळीत वेगवेगळ्या कप्प्यात लावलेल्या क्लायमेट सेन्सरमुळे चाळीतील तपमान आणि आर्द्रता याचा रिअल टाइम डेटा आम्हाला मिळतो. त्यात विपरीत बदल दिसताच आम्ही ते शेतकऱ्यांना अलर्ट पाठवितो. त्यामुळे सडण्याच्या प्रक्रियेआघीच शेतकरी सावध होऊन त्याचा कांदा चाळीतून काढून नुकसान टाळू शकतो. सोबतच गॅस सेन्सरमुळे नेमका कुठला कांदा सडू लागला आहे हे शेतकऱ्याला कळू लागले. नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत याचे पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाले.
कम्युनिटी वेअर हाउसवर
कल्याणी शिंदे हीने सांगितले की, नाशिकमधील सह्याद्री फार्म राजगुरूनगरचे शासनाचे कांदा व लसूण संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी या दोन्ही सेन्सर्सला मान्यता दिल्यावर आम्ही ‘गोदाम इनोव्हेशन्स’ नावाने आमची कंपनी सुरू केली आहे. ही दोन्ही डिव्हाइस शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत कांदाचाळीसाठी उपयुक्त ठरल्यावर गेल्या वर्षीपासून आम्ही कम्युनिटी वेअर हाउसवर काम सुरू केले आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठी गोदाम बांधून शेतकरी त्यांचा कांदा तिथे साठविण्याचे नियोजन करीत आहेत.
शेतकऱ्यांच्या समस्या
अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर गुदाम सेन्स नावाचे उपकरण बनवण्यात तिला यश आले ‘गुदाम सेन्स’ या उपकरणामुळे खराब किंवा सडलेले कांदे वेळीच बाजूला काढणे शक्य झाले आहे. मूळच्या येवला तालुक्यातील पाटोदा येथील कल्याणी राजेंद्र शिंदे हिने लासलगाव येथे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर लगमनेर येथे कॉम्प्युटर सायन्समधून शिक्षण घेतले आहे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने लहानपणापासून शेतकऱ्यांच्या समस्या, प्रश्न बालपणापासून अनुभवले आहेत.
आपल्या शेतकरी बांधवांच्या या समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र आर्थिक परिस्थिती आड येत असल्याने अनेकदा अडचणी येत होत्या या अडचणीवर मात करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस फाउंडेशन आणि कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया यासारख्या संस्थांनी त्यांना आर्थिक सहकार्यासोबतच उपकरण संशोधन करण्यासाठी तांत्रिक मदतही केली दोन वर्षापूर्वी कांद्याच्या साठवणुकीविषयक उपाययोजनांवर संशोधनाचे काम सुरू केले .








