वाशिम: खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे गुरुवारी वाशिम बाजार समितीकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी, परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी चांगले उत्पादन झाले होते. त्यामुळे बाजार समित्यांत शेतमालाची विक्रमी आवक दिसत होती.
अगदी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजार समित्यांत सरासरी १५ हजार क्विंटल शेतमालाची आवक पाहायला मिळत होती; परंतु आता खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेती मशागतीसह बियाणे, खतांसह अवजारांची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरू केली आहे.
सूर्य आग ओकत असताना शेती मशागतीची कामे सकाळीच आटोपती घ्यावी लागतात. त्यानंतर उन्हामुळे बाहेर पडणे धोक्याचे असल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाच्या विक्रीला सद्यस्थितीत विराम दिला आहे.
परिणामी, बाजारातील आवक घटली आहे. वाशिमच्या बाजार समितीत पंधरा दिवसांपूर्वी सर्व शेतमाल मिळून जवळपास १४ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत असे, गुरुवारी मात्र या बाजारात केवळ सात हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली होती. त्यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीन आणि हरभऱ्याचेच होते.
पीक कर्जाच्या लगबगीचाही परिणाम
खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहेच, शिवाय खरीप हंगामात पेरणीकरिता बियाणे, खतांसाठी तजवीजही करावी लागणार आहे. यासाठी शेतकरी खरीप पीक कर्ज काढण्याची लगबग करीत आहेत. त्याचाही बाजार समित्यांमधील आवकीवर परिणाम झाला आहे.
कापूस, सोयाबीन उत्पादन वाढीसाठी सरकारची विशेष योजना