नागपूर: ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशांसाठी आर्थिक उन्नतीचा मार्ग सोईस्कर आहे. त्यासाठी आजच्या तांत्रिक युगात नवनव्या मार्गांचा अवलंब करून उन्नती कशी होईल याकडे लक्ष आहे. यासाठी शेतात मिरचीची लागवड करून अनेक शेतकरी उन्नती साधत असल्याचे चित्र मौदा तालुक्यात पाहायला मिळत आहे.
शेणखत बारीक करून टाकावे, ते शेतजमिनीत मिसळून घ्यावे, त्यापूर्वी शेतीची नांगरणी व वखरणी करून घ्यावी, शेतजमिनीवर गादीवाफे तयार करावे, त्यामध्ये मिरचीच्या वाणाची बियाणे टाकावी, बियाणे उगविल्यानंतर पाचसहा दिवसांच्या अंतराने मिरचीच्या रोपाला पाणी द्यावे, रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी, मिरचीचे रोप तयार झाले की, ज्या ठिकाणी मिरचीच्या पिकांची लागवड करायची आहे त्या ठिकाणी नांगरणी, वखरणी करावी, नंतर मिरचीच्या रोपांची लागवड करावी, लागवडीनंतर रासायनिक खतांचा डोस द्यावा, आठदहा दिवसांनी पाणी द्यावे, नंतर मिरचीच्या पिकांची रोपे वाढतात.
महिनाभरानंतर पिकांचे तण काढावे, डवरणी करून पाणी द्यावे, रोग आल्यास पिकावर रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, आठदहा दिवसांनी मिरचीच्या पिकाला फुलोरा येण्यासाठी औषधांची फवारणी करावी, पुन्हा मिरचीच्या पिकात तण वाढल्यास खुरपणी व डवरणी करावी, मिरचीला फळे येण्यापूर्वी कामे उरकून घ्यावी, पिकाला फळ लागताच पाण्याची मात्रा वाढवावी, आठवड्यात पिकांचे उत्पादन वाढल्यास हिरव्या मिरचीची तोडणी करावी, बाजारपेठेत भाव पाहून आठवडा किंवा पंधरा दिवसांपूर्वी मिरचीची तोडणी करावी, मिरचीचे भरघोस पीक शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीकडे नेते. यासाठी तालुक्यातील शेतकरी मिरची पिकाकडे वळला आहे.
जून महिन्यातच सुरुवात करा
मिरची पिकाला कसदार किंवा मध्यम स्वरूपाची शेतजमीन उत्तम आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडे सिंचनव्यवस्था आवश्यक आहे. हे पीक रब्बी व खरीप हंगामात घेतले जाते. मिरचीच्या रोपांची लागवड केल्यापासून दोनचार महिन्यांत पिकांचे उत्पादन निघते. त्यासाठी जून महिन्यात मिरचीचे रोप तयार करण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, असे धानला येथील शेतकरी श्रीनिवास त्रिपुरणे यांनी सांगितले.
– कापूस लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट, महाराष्ट्रात अनोखे अभियान सुरू